श्रावणातली भजन-गायन परंपरा देतेय आध्यात्मिक ऊर्जा
श्रावण मासात सण-उत्सवांना उधाण येतो. निसर्ग, मानवासह अन्य प्राणी आणि वनस्पती यांच्यातील नैसर्गिक बंधन अधिक घट्ट करणारे सण श्रावणात येतात. मनुष्य हा निसर्ग, प्राणी आणि वनस्पती यांची भाव-भक्तीने पूजा-अर्चा वंदन करून नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळगौरी, जन्माष्टमी, बैल पोळा हे सण मोठ्या आनंदात साजरे करतो. आध्यात्मिक, धार्मिक भावना वृद्धिंगत करणाऱ्या या श्रावण महिन्यामध्ये खेड्यापाड्यात पिढ्यानपिढ्या अभंग, भजन, गौळण गायनाची अनोखी, गौरवशाली परंपरा आजही सुरू आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर, विसोरा येथे शंभरावर वर्षांपूर्वीपासून ही परंपरा कायम असून सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव तेवत ठेवण्यात मोलाचे कार्य करीत आहे. पूर्वी गावात मनरंजन वा जनरंजन करण्याची आजच्या सारखी टीव्ही, मोबाईल, अँप्स अशी हजारो साधने नव्हती. त्यावेळी मानवी समाजातील काही हौशी लोकच आवडीने छंद जोपासून स्वतःसह सर्वांचे करमणूक करीत असत. मराठी वर्षातील गुढीपाडवा ते होळी पर्यंतचा प्रत्येक सणवार धार्मिकता जोपासणारा असल्यामुळे लोकांच्या भावविश्वात त्यांना विशेष स्थान आहे. त...